प्रत्येक कळीत जागत असतो, 
निर्धार फुलं होण्याचा,
दिमाखाने दिसण्याचा, 
अन्, सुगंधाने असण्याचा...



प्रत्येक बालकांमध्ये सर्वांगाने सर्वार्थाने फुलण्याचा बहरण्याचा निर्धार हा उपजतच असतो. गरज असते ती तो निर्धार योग्य वेळी ओळखण्याची आणि आपल्या डोळस प्रेमाने योग्य अशा पालनपोषणाच्या सिंचनाची.... आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्व हे संतुलित आणि परिपूर्ण असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी पालकांंनी प्रथम हेेेे समजून घेतले पाहिजे संस्कार ही काही एका दिवसात करण्याची गोष्ट नाही, तर ती एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे.



खरं तर निसर्गाच्या वरदानाने मातेच्या उदरातून ज्या निष्पाप जीवाचा जन्म होतो त्याचे जीवन पाकळ्या जसे अलगद उमलत जातात आणि कळीचे फुलात रूपांतर होते त्याप्रमाणे अलगद त्या बाळाचेेेेेेेे जीवन हळूहळू आनंदाने फुलवत जाणे, ते अधिकाधिक विकसित करणे हे प्रत्येक मात्या पित्यांचे आद्यकर्तव्य आहे
जन्म फक्त त्या बाळाचा होतं नसतो तर त्या क्षणाला आई-वडिलांचा ही जन्म होत असतो. परंतु दुर्दैवाने फार कमी जणांना आपली ही जबाबदारी ओळखता येते आणि ती निभावली जाते . कित्येकांच्या तर हे गावीही नसतं.. मूल जसजसे मोठमोठं होत जातं तसतशा मात्र पालकांच्या अपेक्षा वाढतच जातात

परंतु हेच पालक मुलांकडून अपेक्षाभंंग झाल्यावर त्यांना दोष देताना मात्र सुरुवातीपासूनचे स्वतःचे परीक्षण करायला मात्र सोईस्करपणे विसरतात.


तापलेल्या लोखंडावर पडलेला दवबिंदू क्षणार्धात नष्ट होतो, त्याची वाफ होऊन तो उडून जातो ...परंतु हाच दवबिंदू जर योग्य वेळी समुद्रातील शिंपल्यात पडला तर त्याचे, सुंदरशा मोत्यात रूपांतर होते.
घरात जर दुर्गुणाचं राज्य असेल ,आई वडील आणि कुटुंबातील इतर व्यक्तींच्या मनात शुचिता ,नीतीमत्ता नसेल तर मग मुलांच्याही मनातील , संस्कारक्षमता नष्ट होईल. कारण संस्कार ही एक अशी गोष्ट आहे जी केवळ बोलण्याने होत नाही तर ती आपल्या कृतीतून घरातील, आणि लहानग्यांवर रूजत असते आणि ती एक प्रक्रिया आहे.

मुलांचे आई वडील, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्ती, त्यांचे आजी- आजोबा, त्यांचे शिक्षक त्यांचे वडील, भाऊ-बहिणी, घरातील इतर व्यक्ती कशा बोलतात..?त्यांची दिनचर्या कशी असते..?इतरांशी कसे वागतात ..? या सर्व गोष्टींचे ते निरीक्षण करत असतात आणि ते निरीक्षण त्यांच्या बालमनाच्या पटलावर कोरली ही जातात .ही अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घेऊन ज्या पालकांना आपल्या मुलांना सुसंस्कारित आणि एक संतुलित परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून घडवायचे असेल त्या पालकांनी हेतुपूर्वक मुलांना योग्य वातावरण योग्य सुविधा पुरवल्या पाहिजे. कारण एखादी चांगली सवय लावण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो त्याच्या एक दशांश वेळात मुलांना वाईट सवयी लागतात आणि मग वेळ निघून गेल्यावर संस्कारांची गाथा गाण्यात आणि निष्फळ रडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून मुलांच्या उत्तम संगोपनासाठी जबाबदार पालकांनी वेळीच सावध व्हायला हवं.
पण सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं ...?
मित्रांनो, मुलांना गुणवान बनविण्यासाठी पालक म्हणून आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे .... अर्थात् सध्या कोविड मुळे संपूर्ण जग हे एका क्लिक वर आले आहे, आणि त्यामुळे मोबाईलचा अतिवापर ही एक मोठी चिंता सध्या सर्वांना भेडसावत आहे. त्या अनुषंगाने काही टिप्स मी देत आहे आणि काही टिप्स ह्या पुढच्या ब्लॉग वर शेअर करीन
टिप्स खालील प्रमाणे👇

१) आपलं मूल सुसंस्कारित करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना भरपूर वेळ दिला पाहिजे:-

इथे वेळ म्हणजे कॉलिटी टाइम अपेक्षित आहे. कारण बऱ्याच पालकांना असे वाटते की मुलांना एखादा सिनेमा बघायला घेऊन जाणे किंवा मॉलमध्ये 2-4 तास खेळवून आणणे म्हणजे वेळ देणे. अर्थात आता काळ बदलला आहे मुलांनाही या गोष्टींचे आकर्षण वाटू लागले आहे आणि पालकांपैकी काहींना तर तो एक प्रेस्टिज ईशूही वाटतो...परंतु हे सर्व करताना ती गोष्ट खरंच तेवढी तोलामोलाची आहे का...? हे नक्की तपासून पहावं. म्हणजे आपण आपल्या मुलाला क्वालिटी टाईम देतोय की त्याचा व्हॅल्युएबल टाईम घेतोय हे आपल्या लगेच लक्षात येईल....



२) पालकांनी स्वतःच्या जीवनाचा व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे:-

मुलं आपण जे सांगतो ते करत नाहीत तर आपण जसे वागतो तसेच करतं....जेव्हा आपली दिनचर्या ही सुनियोजित असेल तरच मुलांपुढे चांगला आदर्श आपण निर्माण करू शकतो .

"लवकर निजे लवकर उठे, 
आरोग्य धनसंपत्ती त्यास लाभे."

असं वारंवार उद्देश करणारे पालकच जर उशिरा उठून धावत पळत आपली नित्य कर्मे करीत असतील तर मुलांना लवकर उठण्याचे महत्त्व कितीही सांगितलं तरी कधीच पटणार नाही . 

'मोबाईल सारखं सारखं पाहू नये ,गेम खेळू नये'

 असे म्हणणारे पालकच जर 24 तास मोबाईल मध्ये डोकं खुपसून असतील तर त्यांच्या मुलांच्या भावविश्वात गोंधळ हा उडणारच .अर्थातच आता कोविड मुळे परिस्थिती अशी झाली आहे की वर्क फ्रॉम होम ला पर्याय नाही .परंतु अशा वेळेला आपण मोबाईल नेमका कशासाठी वापरतो आहोत ,मोबाईलचे अन्य चांगल्या कामासाठी प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो, हे आपण मुलांना विश्वासात घेऊन नीट समजावले पाहिजे ...म्हणजे त्यांच्या मनात

मोबाईल = गेम

फक्त हे समीकरण बसणार नाही

३) तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत काय करता हे तपासून पहा:-

फावल्या वेळेत करमणुकीच्या साधनांचा वापर करणे ह्याच्या मी अजिबात विरोधात नाही, परंतु काम करताना विश्रांती घ्यावीशी वाटली तर विश्रांती म्हणजे फक्त मोबाईल हातात घेणे किंवा टीव्ही बघणे नसून

विश्रांती म्हणजे कामात बदल. 

ही गोष्ट तुम्ही तुमच्या त्यांच्या मनावर तुमच्या कृतीने बिंबवू शकता...उदाहरणार्थ, काम करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर विश्रांतीच्या वेळी किंवा स्वतःच्या फावल्या वेळेत तुम्ही तुमचे स्वतःचे छंद जोपासा...आपली आई किंवा वडील त्यांच्या फावल्या वेळेत सोशल मीडिया किंवा टीव्ही अशा साधनांपासून लांब राहतात आणि त्यांचे छंद जोपासतात, याचीही नोंद तो इवलासा जीव घेत असतो बरं का...!!!
ज्या वेळेला तुम्ही असं करता त्या वेळेला तुम्ही स्वतःसाठी तर भरभरून जगताच, परंतु मुलांसाठी ही वेगवेगळी दालनं उघडी करून देत असता
उदाहरणार्थ :- वाचन, गायन, नृत्य, बागकाम पाककला किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवणे किंवा हस्तकला, विणकाम, भरतकाम, एक ना अनेक गोष्टी आहेत.
हे जेव्हा ते मूल वारंवार पाहिल तेव्हा ते मूल कालांतराने स्वतःच्या छंदा मध्ये देखील मुग्ध होऊन एक वेगळाच आनंद मिळवेल यात शंकाच नाही.
कसं जगायचं ...?का जगायचं ...? ह्या गोष्टींची उकल त्याला, नकळतपणे हळूहळू होत जाईल व त्याच्या जीवनाला एक वेगळाच अर्थ येईल.


४) तुमचा स्वतःचा स्क्रीन टाइम ठरवून ठेवा व त्याचे काटेकोर पालन करा:-

हे असे करणे म्हणजे स्वतःचेही आरोग्य जपणंच आहे आणि असे केल्यामुळे तुमचा अमूल्य वेळ देखील तुम्ही सत्कारणी लावू शकता . तुम्ही तुमच्या घरात एक वेळ ठरवून ठेवू शकता उदाहरणार्थ दुपारी एक ते पाच आपण सर्वांनी कुठल्याही प्रकारची स्क्रीन बघायची नाही.. किंवा रविवारी पूर्णपणे सोशल मीडियाला सुट्टी द्यायची. अर्थात ही वेळ, किंवा दिवस तुम्ही तुमच्या कामाच्या वेळा तपासून ,जोडीदाराच्या मदतीने ठरवू शकता. परंतु जी काही वेळ ठरवली असेल ती जर का एकदा ठरवली तर मात्र कुटुंबातील प्रत्येकाने त्याचे काटेकोर पालन करायचे असा गेमच मुलांसमोर खेळा. नियम मोडल्यास एखादी हलकीफुलकी शिक्षा होणार असेही हसत हसत सांगा आणि तो नियम मात्र घरातील प्रत्येक सदस्याला लागू ही करा.
मग बघाच गम्मत 😃....
तुमचं मूल हळूहळू कसे या मोबाईलच्या जंजाळातून स्वतःला दूर ठेवू लागेल. दुर्दैवाने आता शाळा, आपले ऑफिसेस ह्या सर्वच गोष्टी मोबाईलवर एकवटल्या असल्यामुळे सध्या तरी मोबाईल ला पर्याय नाही, परंतु अशाप्रकारचे मजेशिर खेळ खेळल्यामुळे आणि ते काटेकोरपणे मोठ्यांनीही पाळल्यामुळे तुमचे मूल विनाकारण निश्चितच मोबाईल हातात घेणार नाही....

मित्रांनो,

प्रत्येक आईवडिलांसाठी आपले मुल हे जीव की प्राणच असते .त्याचे कधीही वाईट कुठलेही आई-वडील चिंतणार नाहीत .परंतु आंधळ्या मायेपोटी आपण आपल्या मुलांना घडवतोय कि बिघडवतोय इकडे मात्र आपण कटाक्षाने पाहिले पाहिजे.
प्रेम आणि लाड यामधला फरक वेळीच ओळखून सावधपणे पालकत्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे.

पुढच्या टिप्स पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगिन.

ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा...

धन्यवाद...!!!

-प्राची पाटील



Share